राम-लक्ष्मणामुळे विश्वामित्रांचा यज्ञ सिद्धीस   

भावार्थ रामायणातील कथा : विलास सूर्यकांत अत्रे

श्रीरामाने त्राटिकेचा वध केल्यामुळे सुरवर आनंदीत झाले. त्यांनी श्रीरामावर पुष्पवृष्टी केली. शंख, तुतार्‍या, नगारे वाजवून श्रीरामाचा जयजयकार केला. त्राटिका वधामुळे प्रसन्न झालेल्या देव, देवता, ऋषिमुनींनी श्रीरामाच्या जयघोषाने आकाश दुमदुमून टाकले. विश्वामित्र करीत असलेल्या यज्ञाच्या सिद्धीसाठी ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी, श्रीरामाला अस्त्रविद्या द्यावी, असे इंद्राने विश्वामित्रांना सांगितले. त्यानंतर राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र यांनी विश्वामित्रांच्या सांगण्यावरून सिद्धाश्रमात निवास केला. 
 
दुसर्‍या दिवसापासून विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला अस्त्रविद्या शिकवली. विविध प्रकारची शस्त्रे, ती कशी वापरायची, कशी प्रेरायची, माघारी घ्यायची याचे शिक्षण दिले. धनुर्विद्येचे धडे दिले. त्यांना मल्लविद्या, मंत्रविद्या हे सारेच शिकविले आणि ही सर्व विद्या प्राप्त झाल्यानंतर ते तिघेही विश्वामित्रांच्या आश्रमात पोहोचले.
 
आश्रमात यज्ञाची सगळी तयारी ऋषिमुनींनी केलेली होती. राम लक्ष्मण यज्ञ मंडपांपाशी आले. रामाच्या मनात यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांचा कसा बंदोबस्त करावा हा विचार चालला होता. म्हणून रामाने ऋषिमुनींना विचारले राक्षस कसे येतात, कधी येतात? कुठून येतात आणि काय त्रास देतात? त्यावर विश्वामित्र ऋषिंनीच त्यांचा त्रास कसा होतो ते कसे उपद्रव करतात हे श्रीरामाला सांगितले. याग सुरू केल्यापासून सहाव्या दिवशी हे राक्षस अचानक, कुठूनही, कसेही येऊन हल्ला करतात. सगळ्या यज्ञाचा विध्वंस करतात, नाश करतात; पण ते राक्षस कधीही येऊन कार्यात विघ्न आणू शकतात. तेव्हा क्षणोक्षणी सावध राहावे लागेल, याची जाणीव रामाला झाली होती.
 
यज्ञाची तयारी सुरू झाली. फुले, पाने, पत्री, फळे यांचे ढीग लागले होते. गोरस, गोमुत्र, गोमय, तसेच घृत, मध पंचामृत, सारेच तयार होते. हळद कुंकुम, मंगल तोरणे यांसह सर्व गोष्टींची तयारी झाली होती, वेदी तयार होतीच. यज्ञध्वज उभारले गेले. वेदीभोवती चारी बाजूस दर्भ पसरला गेला. हवनासाठी लागणार्‍या समिधा सोडून ठेवल्या गेल्या. यज्ञासाठीचा अग्नी प्रदीप्त केला गेला. विश्वामित्रांनी यज्ञाचा संकल्प सोडला. यज्ञमंडपाच्या दारात राम, लक्ष्मण आपले धनुष्यबाण सज्ज करून सावध होऊन उभे राहिले.
 
विश्वामित्रांचा कर्मयोग आणि रामाचा क्षात्रयोग समसमान आहेत. कर्मयोगाच्या भाषेत श्रीरामाचा क्षात्रयोग सांगायचा म्हणजे राम जेवणास ताटावर बसला आहे. ताटावर बसल्यावर जेवणापूर्वी त्राटिका वधाने रामाने ताटाभोवती पाणी प्रोक्षण केले, सुबाहूच्या वधाची चित्रावती घातली, त्रिशिरा आणि खर दूषण यांच्या वधाने प्राणाहुती दिली. कुंभकर्णाचा वध म्हणजे कढीभात झाला. इंद्रजित वध म्हणजे पक्वान्न झाले, तर रावणाचे प्रधान राक्षसगण हे भाजी आणि मीठ झाले. आखया (रावणाचा एक मुलगा) आणि इतर यांचा वध म्हणजे लोणचे झाले. रावण वध म्हणजे दहीभात झाला. उत्तरापोषण रणत्याग झाला, असे रामाच्या क्षात्रयोगाचे परिपूर्ण भोजनच रामाने केले होते.
 
दिवस-रात्र राम लक्ष्मणाचा पहारा असल्यामुळे राक्षसांचे तिथे काही चालत नव्हते. त्यांना यज्ञमंडपात प्रवेशही करता येत नव्हता. यज्ञात विघ्न आणणे त्यांना अशक्य झाले होते. यज्ञात विघ्न आणता येत नाही हे पाहून सुबाहू (त्राटिकेचा मुलगा) याला खूप राग आला. तो मुळात आक्राळ विक्राळ राक्षसच होता. संतापून त्याने भयंकर रूप धारण केले होते. रामाला भयभीत करण्याचा त्याचा प्रयत्न होता. अंधारात येऊन नाना प्रकारे त्रास देण्याचा, हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला; पण राम सावध होता, पराक्रमी होता. त्यामुळे त्याचे रामाच्या पुढे काहीही चालेनासे झाले होते. त्याला तर आपली आई त्राटिका हिच्या वधाचा सूड घ्यायचा होता.
 
यज्ञमंडपात शिरायला रामामुळे वावच मिळाला नाही, म्हणून सुबाहूने सर्व राक्षसांसह विश्वामित्रांच्या आश्रमावरती हल्ला चढविला. यज्ञ मंडपावर रक्त मासांचा वर्षाव सुरू केला. रामाने हसत त्या सगळ्यांचा सहजपणे बंदोबस्त केला. रामबाणांनी सुबाहूला पूर्ण वेढले. सुबाहूची ही बिकट अवस्था पाहून त्याच्या मदतीला त्याचा भाऊ मारिच धावून आला. कर्कश्य आवाज काढीत, जोर जोरात ओरडत, भेसूर रूप घेऊन जबडा वासून तो रामावर धावून आला. ते दृष्य पाहून याग करणार्‍या ब्राह्मणांची पाचावर धारणा बसली. काही ब्राह्मण घाबरून गेले, कित्येकांना कापरे भरले, कुणाच्या दातखिळी बसल्या, पुरोहितांची ही अवस्था पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘अरे त्या पुरोहितांना जाऊन सांग, कुणीही घाबरू नका. तुम्हाला काही एक होणार नाही. तुमच्या नखालाही धक्का बसणार नाही. तुम्ही तुमचे विधी चालू ठेवा. मी या सगळ्या राक्षसांचा क्षणात नि:पात करीन‘ रामाने असा सगळ्यांना धीर दिला. रामाने एका बाणाने सुबाहूचे प्राण हरण केले आणि दुसरा बाण मारिचाच्या मागे लावून दिला. त्या मारलेल्या बाणाने मारिचाला गवताच्या काडीसारखे आकाशात उंच उडवले आणि शंभर योजना दूर असलेल्या समुद्राच्या तीरावर फेकून दिले. एका बाणात सुबाहूचा वध रामाने केल्याचे मारिचाने पाहिले होते. मारिचाला आपल्या जीवाची भीती वाटली. जीव वाचविण्याचा एकच उपाय त्याच्या हातात होता तो म्हणजे रामाला शरण जाणे. नाही तर आपलाही सुबाहूसारखा वध रामाच्या हातून या क्षणीच होईल याची त्याला खात्री वाटली. अजून तरी तो क्षण यायचा होता. मरणाच्या भीतीने मारिच रामाला शरण गेला. मारिचाचे मरण रावणाच्या सांगण्यावरून पुढे त्याने सुवर्णमृगाचे रूप घेतल्यानंतर येणार होते. त्याशिवाय रामायण पुढे घडणार नव्हते. शरण आलेल्या मारिचाला रामाने जीवदान दिले. 
 
जगदंबेची प्रार्थना
 
रामाने सुबाहू त्याचे असंख्य राक्षस गण, तसेच मारिचाचे असंख्य राक्षस गण या सर्वांना छिन्न विछिन्न करून ठार मारून टाकले होतेे. त्यामुळे आश्रमाच्या अवतीभवती त्यांच्या प्रेतांचा खच पडला होता. कुठे मुंडकी पडलेली होती, कुठे नुसताच धडांचा खच झाला होता, कुठे देहाशिवाय हात, पाय मातीत पडले होते. रक्तमासाचा चिखल झाला होता. रक्ताचे लोट वहात होते. दुर्गंधी सुटली होती. हे दृष्य पाहून आश्रमातील सगळेच घाबरून गेले, हबकून गेले. त्यांच्या मनात शिसारी बसली. अतिशय भयानक, बिभित्स असे ते दृष्य होते. डोळ्यांनी ते पहाणेही अशक्य कोटीतील गोष्ट होती. ही घाण कशी काढायची आणि कोण काढणार? कोण आवरणार? हा प्रश्न सार्‍या आश्रमवासीयांना पडला होता. आश्रमातील सगळ्यांच्या मनातील काळजी, चिंता रामाच्या लक्षात आली होती. हा सगळा पसारा, ही घाण, ही प्रेते सगळे आवरले जाईल असे त्याने सगळ्यांना आश्वासन दिले. रामाने जगदंबेला प्रचारण केले. तिला वंदन केले. तिने तिची कोट्यानुकोटी असलेली भुतावळ घेऊन यावे आणि हा परिसर मंगलमय करावा, अशी तिला विनंती केली. रामाच्या विनंतीवरून माता जगदंबा स्वत: आपली समस्त भुतावळ घेऊन आश्रमात आली. तिच्या आज्ञेने समस्त भुतांनी काही क्षणात सर्व प्रेते वाहून नेली. मांस रक्ताने भरलेला आश्रम स्वच्छ केला, आश्रमात सडा संमार्जन करून फुलांच्या माळांनी तो सजविला. धूप लावला, सुगंधी द्रव्ये शिंपडली. संपूर्ण परिसर निर्मळ केला, शुद्ध केला, पवित्र केला. आश्रमाभोवती झालेल्या नरकाचे जगदंबेच्या कृपेने नंदनवन झाले. जगदंबेने नंतर रामाची पुजा केली, त्याला धूपदीपाने ओवाळले, त्याला वंदन केले आणि रामाची परवानगी घेऊन ती स्वस्थानी गेली.
 
प्रसन्न झालेल्या विश्वामित्रांना तर आपल्या शिष्याच्या पराक्रमाने त्याचे किती कोडकौतुक करावे असे झालेे. विश्वामित्रांनी त्यानिमित्त बराच दानधर्म केला. रामाने राक्षसांचा नि:पात केल्यामुळे विश्वामित्रांचा यज्ञ सिद्धीस गेला. त्यांचे मनोरथ पूर्ण झाले आणि आई जगदंबेच्या कृपेने संपूर्ण परिसर मंगलमय झाला. रामाच्या पराक्रमाची दुंदुभी त्रैलोक्यात वाजली. 

(आधार संत एकनाथकृत भावार्थ 

रामायण बालकांड अध्याय १३)

 

Related Articles